विधानसभा निवडणुकीत आपल्याला मोठे यश; स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी एक नवीन ऊर्जा घेऊन आपल्याला काम करायचे आहे.

विजय शिंदे
८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धोरण असून आगामी काळात पक्ष संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील घरोघरी पोहोचण्याचे काम करू असे मत इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २६ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने इंदापूर येथील पक्ष कार्यालयात पक्षाचा झेंडा उभारून व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना पेढे भरवून फटाक्याच्या आतषबाजीत वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी झगडे बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले आता गेली आठ वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळे चार महिन्यानंतर येणाऱ्या या निवडणुकीला आपल्याला मोठ्या ताकदीने सामोरे जायचे आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्याला मोठे यश मिळाले असून, आता एक नवीन ऊर्जा घेऊन आपल्याला काम करायचे आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा खूप मोठे यश आपल्याला मिळालेले असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी वर्धापन दिनाच्या निमित्ताने इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी उपस्थित होते.



