Uncategorized

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाचे तात्काळ पंचनामे करा-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रशासनाला सूचना.

विजय शिंदे

बारामती व इंदापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे सोबत होते. आपत्तीच्या काळात नागरिकांना मदत करणे राज्य शासनाचे कर्तव्य असून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, एनडीआरएफच्या निकषानुसार बाधित नागरिकांना मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन श्री. पवार यांनी यावेळी केले.

श्री. पवार यांनी सकाळी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ परिसरातील इमारती, कन्हेरी वनोद्यान, कन्हेरी काटेवस्ती येथील नीरा डावा कालवा, सोनगाव, ढेकळवाडी, इंदापूर तालुक्यातील सणसर, निंबोडी, शेटफळगढे, मदनवाडी आणि भिगवण येथील बसस्थानक परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्याकडून माहिती घेतली.

श्री.पवार म्हणाले, बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यातील वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी १४ इंच असून काल २५ मे रोजी एकाच दिवशी ७ इंच पाऊस झाला आहे. नीरा डावा कालवा लिमटेक आणि काटेवाडी आणि भवानीनगर दरम्यान दोन ठिकाणी कालवा फुटला होता. कालव्यामधील पाणी कमी होत आहे. या दोन्ही तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

या अतिवृष्टीमुळे घराचे, पिकांचे, शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. या भागातील नागरिकांची अल्पोहर, जेवण आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्यावरील साचलेला गाळ काढण्याचे काम सुरु आहे, रस्त्यावरील खड्डे भरुन काढण्यासह परिस्थितीचा अंदाज घेऊन बंद असलेले रस्ते सुरु करण्यात येत आहेत. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ मिळालेले परंतु या आपत्तीत घराचे नुकसान झालेल्या नागरिकांना विशेष बाब म्हणून घरकुल मंजूर करण्याबाबत विचार करण्यात येईल. एकही नागरिक बेघर राहणार नाही, अशी ग्वाही श्री.पवार यांनी दिली.

नागरी वस्तीमध्ये रोगराई पसरु नये याकरीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औषधे फवारणी करावी. कालवा फुटलेल्या ठिकाणी दुरुस्तीची कामे करावी. ओढ्यामधील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करुन ओढा रुंदीकरण, खोलीकरणाचे काम करण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करावे. याकरिता निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

चारीच्या मध्यभागापासून रस्त्याच्या बाजूला ५९ टक्के आणि दुसऱ्या बाजूला ४० टक्के क्षेत्र आरक्षित असून या क्षेत्रातील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी. शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्याकरिता रस्त्याची नितांत गरज असते, आगामी काळात चाऱ्यात अतिक्रमण करु नये. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या दरम्यान येणाऱ्या चारीच्यावरती संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करण्याचा सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिल्या. पाणी कमी झाल्यानंतर महावितरणने विद्युत पुरवठा सुरु करावा. ज्याठिकाणी आवश्यकता आहे त्याठिकाणी उपरस्ता करण्यात येईल. सर्व संबंधित यंत्रणेने खबरदारीचा उपाय म्हणून समन्वयाने काम करावे. नागरिकांना धीर देऊन त्यांना आवश्यक ती मदत करावी, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

बारामती शहरातील ३ इमारतीच्या बाजूला भेगा पडल्या असून नगर परिषदेने तात्काळ संरक्षणात्मक लेखापरीक्षण करावे. या इमारतीचे लेखापरीक्षण होईपर्यंत नागरिकांनी राहण्यासाठी जाऊ नये. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आगामी काळातही अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे, नागरिकांनी काळजी घ्यावी, अडीअडचणीच्या काळात प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

इंदापूर तालुक्यातील भिगवण बस्थानकाच्या दुरुस्तीचे काम करावे. शेटफळगडे येथील ओढ्याची उंची वाढवावी. सणसर परिसरातील बाजारपेठ विचारात घेऊन सेवा रस्ता तयार करावा, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, बारामती तहसीलदार गणेश शिंदे, इंदापूर तहसीलदार जीवन बनसोडे, गट विकास अधिकारी अनिल बागल, सचिन खुडे आदी उपस्थित होते.
0000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button