भाटनिमगाव येथील देवकर वस्तीवरील नागरिकांचा रस्त्याचा वनवास कधी संपणार.?

विजय शिंदे
मान्सूनची राज्यात एन्ट्री होताच पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यभरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक बंद झाली आहे. पावसाच्या या तुफान बॅटिंगने अनेक पूरस्थिती निर्माण होऊन ठिकाणी गाड्या, जनावरे, वाहून गेल्याच्या घटना घडत आहेत, ज्याचे व्हिडिओही माध्यमांवर व्हायरल होत आहेत.
अशातच इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथील देवकर वस्तीवरील नागरिकांचा रस्त्याचा वनवास कधी संपणार.? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक व परिसरातील शेतकरी यांना चिखल तुडवत घराकडे जावे लागत आहे. देवकर वस्तीवरील रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या वतीने वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी करुनही याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अनेक निवडणुकीमध्ये आश्वासने देऊनही या रस्त्याचे दुरुस्ती व डांबरीकरण करण्यात येत नाही आमच्या वस्तीचा उपयोग फक्त मतदानासाठी केला जातो, निवडणुका आल्या की आश्वासन दिली जातात परंतु ती नंतर पाळली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
सतत पडणाऱ्या पावसाने रस्ता खराब होऊन खाचखळगे व खड्ड्यामुळे दुरावस्था झाली आहे.पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला असून त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, स्थानिक ग्रामस्थ व आजारी रुग्णांना त्रास व हाल सहन करावे लागत आहेत.
यापूर्वी क्रीडा अल्पसंख्यांक युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देवकर वस्ती रस्त्याचे भूमिपूजन केले होते. परंतु नंतर त्याच्यावर काही कारवाई झाली नाही, नंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली, मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देवकर वस्तीवरील रस्त्यासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी स्थानिक रहिवासी व ज्येष्ठ पत्रकार रामदास देवकर यांनी केली आहे.



